After Sleep

झोपून उठल्यावर
- डॉ. श्री. बालाजी तांबे (www.balajitambe.com)
शुक्रवार, 25 मार्च 2016 - 03:19 PM IST

जो मनुष्य खूप झोपतो तो आयुष्यात काही करू शकत नाही. ‘झोपला तो संपला’ ही घाटात लावलेली पाटी वाहनाच्या चालकासाठी असली, तरी ती अति झोपणाऱ्या आळशी माणसांसाठी सुद्धा असते असे समजायला हरकत नाही. झोपेच्या तासांचे गणित एकदा नक्की बसलेले असले, की वेळ ठरवून उठायचे निश्‍चित करून त्यानुसार उठायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होतो. मला स्वतःला ठरविल्या वेळी उठता येते हे आत मनात अंतरात्म्याला पोचलेले असले की, पाहिजे तेव्हा मनुष्य खरोखर उठू शकतो. जीवन अप्रतिम जगता यावे असे ज्यांना वाटते त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून, वेगवेगळ्या लोकांच्या सवयी व त्यांची पद्धत यांचे परीक्षण करून असे नियम तयार करून मार्गदर्शन केलेले दिसते. शेवटी आपला मार्ग ज्याचा त्याने स्वतःच्या अनुभवावरून ठरवायचा असतो, परंतु काही झाले तरी झोप समाधीसारखी शांत पाहिजे, तरच जीवनाची दिशा सकारात्मक होईल. 

सकाळी उठल्यानंतर प्रथम प्रार्थना करावी व कामाला लागावे. बहुतांशी मंडळी जागी होतात, ती स्वतः उठत नाहीत. म्हणजे ‘झोपेतून बाहेर येणे’ ही क्रिया ते करत नाहीत. झोप निघून गेली की माणसे जागी होतात. पण स्वतः झोपेतून जागे व्हायचे असेल तर जीवनाचे गणित अत्यंत संतुलित असणे महत्त्वाचे असते. तसा प्रयत्न करणे आवश्‍यक असते. मनुष्य उदार, दानशील, नम्र असला तर त्याची झोप चांगली असू शकते. त्यांचे झोपेवर नियंत्रण असू शकते. वागणुकीत बदल करून घेतले की नंतर एका विशिष्ट वेळेला मी उठणार असे ठरवावे, डोळे मिटून स्वतःच्या आत असलेल्या आत्मारामाला (आत असलेल्या शुद्ध जाणिवेला) तशी प्रार्थना करावी. गजर न लावता किंवा कुणाला उठवायला न सांगता झोपून जावे. ठरविलेल्या वेळी जाग येते का ते पाहावे. अर्थात ज्या दिवशी गाडी वगैरे पकडायची असेल, कुणाला वेळेवर भेटायला वगैरे जायचे असेल त्या दिवशी असे प्रयोग करू नयेत. आपण ठरविलेल्या वेळी आपल्याला नक्की उठता येते हे सिद्ध होईपर्यंत सावधान राहावे. गजर लावून उठायची किंवा कोणीतरी उठवायची सवय असली तरी किती वेळा हाक मारल्यावर उठणे होते याची साधारणतः माहिती करून घ्यावी. एका हाकेत जाग येत असली तर पाहिजे तेव्हा स्वतः उठता येते. गजर फार वेळ वाजत राहण्यापेक्षा गजर वाजल्या वाजल्या पटकन उठून बंद करण्याची सवय लावून घेणे आवश्‍यक असते. किती वेळ झोपावे हेही निश्‍चित करून घेणे आवश्‍यक असते. म्हणजे साधारण सहा तास झोपणाऱ्याला पहिल्या तास-दीडतासात पटकन उठता येऊ शकते. त्यानंतर पुढच्या एक-दीड तासात उठणे खूप अवघड असते. सहा तास झोपण्याची सवय असली तर रात्री ११ वाजता झोपलेला माणूस सकाळी पाचला सहज उठू शकतो. 

लहान मुले साधारणतः २०-२२ तास झोपतात. वाढत्या वयानुसार झोप कमी होत जाते. वयाच्या बाराव्या वर्षांनंतर साधारण पाच तासांवर झोपू नये. पस्तिशी-चाळिशीला आल्यावर साधारण सहा तास झोपावे. साठीला आल्यावर झोप सात तासाची करावी. शरीर जास्त थकत असेल तर दुपारच्या वेळी वामकुक्षी करावी (अर्ध्या तासाची झोप घ्यावी). हे एक साधारण मार्गदर्शन आहे. मिनिटाबरहुकूम असेच्या असे व्हायला पाहिजे असे नाही.
जो मनुष्य खूप झोपतो तो आयुष्यात काही करू शकत नाही. ‘झोपला तो संपला’ ही घाटात लावलेली पाटी वाहनाच्या चालकासाठी असली तरी ती अति झोपणाऱ्या आळशी माणसांसाठी सुद्धा असते असे समजायला हरकत नाही. 

झोपेच्या तासांचे गणित एकदा नक्की बसलेले असले की वेळ ठरवून उठायचे निश्‍चित करून त्यानुसार उठायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होतो. मला स्वतःला ठरविल्या वेळी उठता येते हे आत मनात अंतरात्म्याला पोचलेले असले की, पाहिजे तेव्हा मनुष्य खरोखर उठू शकतो. 

रविवार वगैरे असला, थोडा तब्येतीचा त्रास असला तर आज जरा सावकाशीने घेऊ या, थोडे शांतपणे झोपू या असे मनाने घेतलेले असते. अशा वेळी किंवा कधी डोंगरावर वगैरे फिरायला गेले तर शरीर थोडे जास्त आंबलेले असल्यामुळे त्या दिवशी जरा जास्त झोप घ्यावी. त्या दिवशीही कमी झोपून दुसऱ्या दिवशी लवकर उठून घाईघाईने कामाला लागले तर शरीरावर आलेला ताण जिरविण्याची क्षमता शरीरात नसते. अशा वेळी आजाराला आमंत्रण मिळते. सवयीने दोन-तीन दिवसांचा ताण साठवून नंतर भरपूर झोप घ्यावी व ताणमुक्‍त व्हावे. परंतु सर्वसामान्यतः वेळच्या वेळी शरीराला विश्रांती देणे श्रेयस्कर ठरते. घाट चढणे, अधिक पायऱ्या चढणे वगैरे झालेले असले तर पाय-पोटऱ्यांना तेल लावून झोपणे, अधून मधून झोपण्यापूर्वी छाती-पोटावर तेल लावणे, आठवड्यातून एकदा झोपण्यापूर्वी तरी मेरुदंडावर तेलाचा मसाज करणे या गोष्टी चांगल्या झोपेसाठी व दीर्घायुष्यासाठी उपयोगी ठरतात. 

झोपायच्या आधीची दहा मिनिटे जास्तीत जास्ती स्वतःच्या बरोबर साक्षीत्वाने राहणे आवश्‍यक असते. झोपेपर्यंत टीव्ही पाहणे, आता बसवत नाही असे म्हणून टीव्ही पाहता पाहता झोपणे वगैरे सवयी आरोग्यासाठी योग्य नव्हेत. झोपायच्या आधी १० मिनिटे बिछान्यात पडल्या पडल्या छान संगीत ऐकावे, एखादे स्तोत्र ऐकावे किंवा म्हणावे, ते स्तोत्र संस्कृत असले तर मेंदूला अधिकच उपयोगी ठरते. अशा तऱ्हेने झोपण्याच्या आधी नेहमी प्रार्थना करण्याची सवय ठेवावी. सकाळी जाग आल्या आल्या काही वेळ डोळे उघडू नयेत. जाग आल्या आल्या घडाळ्याकडे पाहून ‘ओ माय गॉड, आजही उशीर झाला’ असे उद्गार बाहेर पडणे, हे दिवस वाईट जाणार याचे लक्षण असते. 

रोज सकाळी उठल्यावर दोन्ही हातांच्या तळव्यांकडे पाहून, प्रार्थना करून, नमस्कार करून उठावे तसेच उठल्यावर पलंगावरील चादरीकडे लक्ष द्यावे. झोपण्यापूर्वी चादर गादीखाली दुमडली होती तशीच आहे की सुटून बाहेर आलेली आहे, किती चुरगळलेली आहे, हे पाहावे. यामुळे रात्री झोपेमध्ये मनुष्य किती अस्वस्थ होता याचा अंदाज येतो. उन्हाळा असला तरी पातळसे पांघरूण अंगावर घ्यावे. थंडीत पुरेसे पांघरूण अंगावर घ्यावे. ज्यांना पंखा किंवा एसीशिवाय झोप येत नाही त्यांनी लोकरी किंवा रेशमी रुमाल डोके, गळा व कानांवर अवश्‍य बांधावा. झोपताना कपडे सैल असावेत. संपूर्ण विवस्त्र होऊन कधीच झोपू नये. 
हे सर्व नियम कोणी सांगितले असा प्रश्न कोणी विचारू शकेल. जीवन अप्रतिम जगता यावे असे ज्यांना वाटते त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून, वेगवेगळ्या लोकांच्या सवयी व त्यांची पद्धत यांचे परीक्षण करून असे नियम तयार करून मार्गदर्शन केलेले दिसते. 

शेवटी आपला मार्ग ज्याचा त्याने स्वतःच्या अनुभवावरून ठरवायचा असतो, परंतु काही झाले तरी झोप समाधीसारखी शांत पाहिजे, तरच जीवनाची दिशा सकारात्मक होईल. 

खरे तर जाग आल्यावर प्रथम पुढील प्रार्थना म्हणावी,
कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती । 
करमध्ये तु गोविन्दम्‌ प्रभाते करदर्शनम्‌ ।।

तळहात एकमेकांवर चोळून नंतर दोन्ही हात चेहऱ्यावर झाकून शेक करावा. त्यानंतर बोटाच्या अग्रावर श्री लक्ष्मीचे, मनगटाजवळील भागावर श्री सरस्वतीचे व तळहाताच्या मध्यभागी श्री गोविंदाचे दर्शन घ्यावे. याचा अर्थ असा की श्रमप्रतिष्ठेने हाताने काम केले की लक्ष्मी येते, सर्व कर्मांच्या मुळाशी असावे ज्ञान आणि हातामध्ये इंद्रियनिग्रह असला की दिवसाची सुरुवात चांगली होते तसेच संपूर्ण दिवस उत्तम जातो. 
नंतर खालील श्‍लोकाप्रमाणे क्षमाप्रार्थना म्हणावी, 

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । 
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे।।

भूमी ही मातृभूमी - माता. सकाळी उठल्यावर भूमीला प्रथम पाय लावला जातो व स्वतःचा भार जमिनीवर टाकला जातो, यासाठी क्षमा मागावी ही अपेक्षा. तसेही चूक झाल्यावर माफी मागण्याची सवय हीच नैतिकता म्हणावी लागेल. झोपेतून उठताना म्हणायची ही प्रार्थना भारतीय संस्कृतीची उत्तुंगता दर्शविते. 

Comments

Popular posts from this blog

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू

Advaita and ISKCON