Posts

Showing posts from 2011

Yatna to dev janava

" The Hardest Part of doing a difficult job is getting Started."." संपूर्ण जगप्रवास केवळ सायकलवर पूर्ण केलेल्या विक्रमवीराला पत्रकारांनी विचारलं, "सगळ्यात कठीण घाट तुम्हाला कोणता वाटतो?' मंदस्मित करीत तो उत्तरला, "उंबरठा घाट!' ज्याला घराचा उंबरठा घाट ओलांडता आला, त्याला जगातला कोणताच घाट कठीण नाही. यशाचा मार्ग प्रशस्त होतो, तो पायाला भिंगरी लावून; कठोर परिश्रमाचे घाट तुडविल्यानंतरच. यशस्वी अन्‌ कृतार्थ आयुष्यासाठी डोळ्यांसमोर आरसा हवा, नेत्रांत स्वप्नं हवीत, हृदयात ज्वाला हवी, डोक्‍यावर बर्फ अन्‌ तोंडात साखर हवी; पण या साऱ्यांच्या जोडीला पायांना चक्र वा भिंगरी हवी. यश परीक्षेशिवाय प्रसन्न होत नसतं. ही परीक्षा असते कठोर परिश्रमाची. ज्याला यशाचा सुगंध हवा, त्याला घाम गाळण्याशिवाय पर्याय नसतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीची भेट घेतल्यानंतर तिला आश्रमातल्या सुगंधी फुलांचं रहस्य विचारलं. शबरीनं सांगितलं, "हा आश्रम मतंगऋषींचा. एकदा पावसाळा तोंडावर आलेला. सरपणासाठी लागणारी लाकडं कोणी आणायची, यावर शिष्यांमधे वाद सुरू होता. टळटळत्या उन्हात जंगलात जाणार कोण?