Yatna to dev janava

" The Hardest Part of doing a difficult job is getting Started."." संपूर्ण जगप्रवास केवळ सायकलवर पूर्ण केलेल्या
विक्रमवीराला पत्रकारांनी विचारलं, "सगळ्यात कठीण घाट तुम्हाला कोणता
वाटतो?' मंदस्मित करीत तो उत्तरला, "उंबरठा घाट!' ज्याला घराचा उंबरठा घाट
ओलांडता आला, त्याला जगातला कोणताच घाट कठीण नाही. यशाचा मार्ग
प्रशस्त होतो, तो पायाला भिंगरी लावून; कठोर परिश्रमाचे घाट तुडविल्यानंतरच.
यशस्वी अन्‌ कृतार्थ आयुष्यासाठी डोळ्यांसमोर आरसा हवा, नेत्रांत स्वप्नं हवीत,
हृदयात ज्वाला हवी, डोक्‍यावर बर्फ अन्‌ तोंडात साखर हवी; पण या साऱ्यांच्या
जोडीला पायांना चक्र वा भिंगरी हवी. यश परीक्षेशिवाय प्रसन्न होत नसतं. ही परीक्षा
असते कठोर परिश्रमाची. ज्याला यशाचा सुगंध हवा, त्याला घाम गाळण्याशिवाय
पर्याय नसतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी शबरीची भेट घेतल्यानंतर तिला आश्रमातल्या
सुगंधी फुलांचं रहस्य विचारलं. शबरीनं सांगितलं, "हा आश्रम मतंगऋषींचा. एकदा
पावसाळा तोंडावर आलेला. सरपणासाठी लागणारी लाकडं कोणी आणायची,
यावर शिष्यांमधे वाद सुरू होता. टळटळत्या उन्हात जंगलात जाणार कोण?
स्वत: मतंगऋषींनी खांद्यावर कुऱ्हाड घेतली. त्यांच्या मागोमाग शिष्यांनासुद्धा
जावे लागले. दिवसभर घाम गाळून आवश्‍यक सरपण गोळा झालं. दुसऱ्या दिवशी
ज्या मार्गाने ते गेले होते, त्याच मार्गावर सुगंधी पुष्पांचा घमघमाट सुटलेला होता.
मतंगऋषींनी शिष्यांना सांगितलं ""बाबांनो! तुमच्या कालच्या घामातून पसरलाय हा
सुगंध. आयुष्यभर लक्षात असू द्या, समृद्धीच्या सुगंधाला घामाचंच खतपाणी हवं
असतं.''
"ध्यास एक साधका अंतरात ठेव तू ।
जाण यत्न देव तू जाण यत्न देव तू ।।'
निसर्ग आपल्याला ही गतिशीलता शिकवतो. छोट्या मुंगीचं आयुष्य अन्‌
अस्तित्व ते काय? पण, अखंड परिश्रम हीच तिची जीवनसाधना. एका मधमाशीला
पाचशे मिलिग्रॅम मध गोळा कराण्यासाठी 2 लाख फुलांचा मकरंद शोषून आणावा
लागतो, असं संशोधनांती सिद्ध झालंय. केवढी कठोर मेहनत! पण, याचमुळे
तुम्हाआम्हाला शेकडो औषधांचा आधार असणारा अमृततुल्य मध मिळतो.
"कहै निपट निरंजन ताना है न बाना है।
इतना नहीं जाता तो एैसी तैसी में बिताना है।।'
घोडा का अडला, पानं का सडली आणि भाकर का करपली, या तिन्ही
गोष्टींचं उत्तर एकच असतं, "न फिरवल्यामुळे!' परिश्रमाशिवाय खात्रीने मिळणारी
एकमेव गोष्ट म्हणजे अपयश. एका दुधाच्या भांड्यात बेडकाची दोन पिलं पडली.
प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता येईना. एकाने निराश होऊन पोहणे सोडून दिले.
गटांगळ्या खात तो तळाशी मृतप्राय झाला. दुसऱ्याने मात्र ठरविले, मरण अटळ;
पण शेवटच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न तर करू या. तो हातपाय हालवीत राहिला. दुधाची
घुसळण झाली. त्यातून सायीचा पापुद्रा पृष्ठभागावर तयार झाला. त्यावर बसून
बेडकाला भांड्याच्या बाहेर उडी मारून प्राण वाचवता आला. अनुकूलतेचा असा
पापुद्रा तयार करण्यासाठी आयुष्याची घुसळण करण्याची तयारी असते का आपली?
घणाच्या शेवटच्या घावाने दगड फोडला जातो, हे अर्धसत्य. तो फुटण्याचा
प्रारंभ तर पहिल्या घावापासूनच सुरू झालेला असतो. न थकता सतत घाव
घालणाराच साऱ्या प्रतिकूलतेचा ध्वंस करू शकतो. सतत परिश्रमातून सामान्य
माणसांनाही असामान्यत्वाचं शिखर गाठता येतं. हिवाळ्यात एका वाळलेल्या
सफरचंदाच्या झाडावर गोगलगाय चढत होती. तिला बघून झाडावरच्या
चिमणीला हसू फुटले. ""अग वेडे! या झाडावर सफरचंदंच काय, साधे पानसुद्धा
नाही.'' गोगलगाय उत्तरली, ""वसंतऋतूत जेव्हा मी वर पोचेन ना, तेव्हा ती
तेथे नक्कीच असतील.'' पुरेशा परिश्रमाशिवाय मिळालेलं यशसुद्धा क्षणभंगुर,
अळवाच्या पाण्यासारखं असतं. चिरस्थायी यशासाठी किंमत चुकवावीच लागते.
रेडिओचा शोध लावणाऱ्या मार्कोनीचे ब्रॉडकास्टिंग स्टेशन आगीने खाक झाले.
विपन्नावस्थेत पत्नीने विचारले, ""आता काय?'' धीरोदात्तपणे मार्कोनी म्हणाला,
""आता काय? I Must work hard.'''' शेतात आपल्या मुलाला मेहनत
करायला लावणाऱ्या शेतकऱ्याला मित्रानं विचारलं, ""पीक आता फुलणारंच;
मग ही मेहनत कशाला?'' तो उद्‌गारला, "I am cultivating my child
not the crop" आयुष्याची मशागत करणाऱ्यांना भरघोस सुखसमृद्धीचं पीक
पदरात येतंच. एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यानंतर पत्रकारांना एका वाक्‍यात आपल्या
यशाचं रहस्य सांगताना एडमंड हिलेरी उद्गारला, 
To be Everest, do'nt be ever at rest. " जमेल आपल्याला हे?


by Ashitosh Adoni - Manovedh -eSakal - 03.11.2011

Comments

Popular posts from this blog

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू

Advaita and ISKCON